दुधाळू जनावरांची खरेदी विक्री करीत असलेल्या व्यापाऱ्यांना गोवंश हत्या बंदी कायद्याचा चांगलाच फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला. या व्यापाऱ्यांकडून त्यांची जनावरे जप्त करण्यात येत आहेत. न्यायिक प्रक्रियेदरम्यान ही जनावरे गौशाळेत ठेवली आणि त्यांच्या दुधाची विक्री केली जाते असा आरोप या संघटनेद्वारे लावण्यात आला आहे.
नागपूर दुधाळू पशू व्यापारी दुग्ध व्यवसायी संघटनेतर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप लावण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रवी दासरवार म्हणाले ‘गोवंश हत्या बंदी कायदा आल्यापासून आम्हाला गोहत्या करणाऱ्या आणि मांस व्यापाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे. आम्ही दुधाळू जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यापार करतो. त्याकरिता आम्ही देशभरातील विविध राज्यांमधून जनावरे विकत आणतो आणि त्यांना येथे विकतो. अनेक वर्षांपासून आमचा हा व्यापार सुरू आहे. परंतु आजकाल पोलिस, बजरंग दल आणि गोरक्षक दल यांच्या आमच्यावर अत्याचार केला आहे. दुधाळ जनावरांची वाहतूक करताना आम्ही अत्यंत काळजीपूर्वकच करीत असतो. परंतु आमच्यावर कारवाई करण्यात येत असून प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.’
दासरवार पुढे म्हणाले ‘या जनावरांच्या वाहतुकीकरिता आम्हाला परवाना मिळत नाही. बैलबंडीवरून ही जनावरे घेऊन जावी, पायदळ घेऊन जावीत, असे आम्हाला सांगण्यात येते. अनेक प्रकरणांमध्ये आमची जनावरे जप्त केली जातात. न्यायिक प्रक्रिया सुरू असताना ही जनावरे नागपूर तसेच वर्धा येथील काही गौशाळांमध्ये ठेवली जातात. त्यांची योग्य काळजी घेतली जात नसल्याचे त्यांचे हाल होतात. इतकेच नाही तर आमच्या जनावरांचे दुध विकून या गौशाळा पैसा कमवित आहेत. ’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट