सोशल मीडियावरून पक्षावर विशेषतः भाजप समर्थकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना थोपवणे आणि गरज पडल्यास ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसची टीम सज्ज झाली आहे. अगदी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना त्यासाठी तयार करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून सोशल मीडियावर राजकारण रंगले. विशेषतः भाजपने या मीडियाचा पुरेपूर वापर केला. भाजपचे विचार असो वा प्रचार या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत आपली भूमिका मांडली. हे करत असताना समर्थकांनी काँग्रेस नेत्यांनाही लक्ष्य केले. सोशल मीडियावरून होणारी टीका वा विनोदाला काँग्रेसने उत्तर दिले नाही. किंबहुना पक्षाचे नेते व कार्यकर्तेदेखील मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे ‘ब्रेक के बाद’ राजकीय वातावरण तापायला लागले आहे. पंचायत समिती, नगर परिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने तयारी चालवली आहे. केंद्रीय पातळीवर दीपेंद्र हुड्डा यांच्या तर, राज्यात भूपेंद्र गुप्ता व अभिजित सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडियाची ब्लॉक पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील या माध्यमात विशेष रुची दाखवली असल्याने विविध पातळीवर तरुणांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपचा अधिकाधिक वापर कसा करायचा, याचे खास प्रशिक्षण देऊन कार्यकर्ते तयार करण्यात येत आहे. हे तिनही माध्यम वापरणाऱ्यांची विभागणी करून त्यानुसार पोस्ट वा माहिती प्रसारित करण्यात येईल. काँग्रेसच्या एखाद्या चांगल्या गोष्टीला उदंड प्रतिसाद लाभून ट्रॉलिंग सुरू झाल्यास विरोधकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात येत असल्यास त्यास प्रत्युत्तर देऊन वस्तुस्थिती मांडण्यात येणार आहे.
भाजपचे सोशल मीडियावर माहिती संभ्रम पसरवणारी किंवा आमच्या नेत्यांना लक्ष्य करणारी असते. आम्ही कुणावरही टीका करणार नाही वा नकारात्मक माहिती टाळण्यात येईल. त्यातून विश्वासार्हता मिळवण्याचा प्रयत्न राहील. ‘ऑर्गेनिक नेटवर्क’ यावर भर देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट