राजकीय इच्छाशक्ती असल्याने नागपूर मेट्रो रेल्वेचे काम गतीने पुढे जात आहे. एनएमआरसीएलचे अधिकारीही वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झपाट्याने कामाला लागले. आतापर्यंत ८२.९९ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली असली तरी खासगी जमीन मिळविण्यासाठी मेट्रो रेल्वेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. नोटीस पाठविण्यात आलेल्यांपैकी केवळ १४ टक्के नागरिकांनी जमीन देण्यास होकार दिला आहे.
नागपुरात साकारणाऱ्या मेट्रो रेल्वेसाठी एनएमआरसीएलला ८९.१६ हेक्टर जमिनीची गरज असून, आतापर्यंत ८२.९९ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित जमीन मिळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. खासगी जमीन मिळविण्याचे मोठे आव्हान मेट्रो रेल्वेपुढे आहे. खासगी जमीन तुलनेने कमी हवी असली तरी त्यासाठी नागरिकांकडून पूर्णता हिरवा कंदील मिळाला नाही.
ऑटोमोटिव्ह चौकातून निघणारी मेट्रो नारी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, गड्डी गोदाम चौक, कस्तूरचंद पार्क, झीरो माइल, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, एरअपोर्ट, मिहानपर्यंत जाणार आहे. प्रजापतीनगर येथून निघणारी मेट्रो वैष्णवदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्सचेंज, चितारओळी चौक, अग्रसेन चौक, दोसर वैश्य चौक, नागपूर रेल्वे स्टेशन, सीताबर्डी, झांशी राणी चौक, शंकर नगर चौक, एलएडीचौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, वासुदेवनगर, बंसीनगर, लोकमान्यनगरपर्यंत जाणार आहे.
जमिनीचा मोबदला अडीचपट
प्रकल्पासाठी ५.३ हेक्टर खासगी जमिनीची गरज आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी ३०२ जमीन मालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. एनएमआरसीएलकडून घेण्यात येत असलेल्या सुनावणीत २५९ जण हजर झालेत. यापैकी ४४ जणांनी मेट्रो रेल्वेसाठी जमीन देण्यास होकार दिला. उर्वरित नागरिकांना विश्वासात घेऊन जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेट्रो रेल्वेमुळे कुणाची कंपाऊंड वॉल, कुणाचे घर, तर कुणाचा खुला प्लॉट जाणार आहे. प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना अडीचपट मोबदला देण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट