संघ हा शिस्तीसाठी ओळखला जातो. सध्या संघात शिस्त बिघडल्याचा घणाणात एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने अलीकडेच केला. या सर्व पार्श्वभूमीवर महानगरातील तरुण थेट सरसंघचालकांसमोरच शिस्तीचे सादरीकरण करणार आहेत, ते विशेष ‘गण-समता’ स्पर्धेच्या माध्यमातून. येत्या बुधवारी ही स्पर्धा होत आहे.
संघ स्थापना ही मुळात इंग्रजांच्या तालिमीकडे पाहून झाली. त्याला संघ संस्थापकांनी राष्ट्र विचारांची जोड दिली. यामुळे संघाच्या आज जगभर सुरू असणाऱ्या लाखो उपक्रमांचे मूळ रोजची एक तासाची शाखा आहे. संघाच्या शाखेत येण्याची व जाण्याचीदेखील विशिष्ट प्रक्रिया असते. रोजच्या ६० मिनिटांच्या शाखेतील मिनिट टू मिनिट कार्यक्रम जवळपास निश्चित असतो. किती वेळ खेळ व्हावा, किती वेळ व्यायाम असावा, किती वेळ श्लोकपठण आणि प्रार्थना असावी, यांचा त्यात समावेश असतो. हा सर्व कार्यक्रम एका विशिष्ट धाटणीत व शिस्तीत असतो. अशा शिस्तीचाच एक भाग असतो ‘गण-समता’.
संघाची स्थापना ही ब्रिटिश लष्कराच्या तालमीनुसार झाली. यामुळेच संघानेदेखील संचलन अर्थात परेड व त्याच्या तालमीला महत्त्व दिले. लष्करात सेक्शन (११ सैनिक) व तीन सेक्शनचे मिळून प्लॅटून व पुढे कंपनी, बटालियन, ब्रिगेड इत्यादी, अशी रचना असते. संघातील सर्वात छोटी रचना ही गण असते. तीन गण मिळून वाहिनी, मग आनिकीनी, प्रागिणी अशी लष्करासारखीच रचना असते. अशा या एका गणांत २२ स्वयंसेवक संघाने निश्चित केले आहेत. त्यांचे संचलन किंवा त्याचा अभ्यास म्हणजे ‘गण-समता’. ही ‘गण-समता’ विशिष्ट प्रकारच्या रचना, त्यातील पदलालित्य, २२ जणांच्या चालण्यातील एकसंघता यावर आधारलेली असते. सध्या कमी होणाऱ्या शाखांमधील तरुणांना एकत्रित करण्यासाठी याच गण-समतेची स्पर्धा थेट सरसंघचालकांसमोर होत आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वत: शिस्तीबाबत कडक आहेत. यामुळे त्यांच्यासमोर बुधवार, ७ डिसेंबरला सायंकाळी ७ ते ८ वाजेरम्यान रेशीमबाग मैदानावर ही स्पर्धा होत आहे. संघाच्या रचनेत महानगरातील एकूण १२ भाग आहेत. प्रत्येक भागाचा किमान एक व अधिकाधिक दोन गण या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. पूर्ण गणवेषात होणाऱ्या स्पर्धेचा जोरदार सराव सध्या प्रत्येक नगरातील प्रमुख मैदानांवर रात्री होताना दिसतो. याची रंगीत तालिम रविवार, ४ डिसेंबरला होत आहे.
२२ तरुणांसाठी तारेवरची कसरत
भविष्यातील स्वयंसेवक तयार करण्याची संघाची पद्धत ही सायम् अर्थात सायंकाळच्या शाखेत असते. पण, सध्या नागपुरातील बहुतांश सायम् शाखा बंद आहेत. यामुळे बालच नाही तर तरुण स्वयंसेवक उपलब्ध होणेही कठीण झाले आहे. या गण समतेसाठी १८ ते ४० वयोगट निश्चित आहे. त्यातही १८ ते २५ वयोगटावर भर अधिक आहे. तसेच हे तरुण झटपट संचालन रचना येणारे हवेत. अशावेळी एका भागातून असे २२ तरुणदेखील मिळवण्यासाठीदेखील संघाच्या अधिकाऱ्यांची आता तारेवरची कसरत सुरू आहे. यामुळे महानरातील दोन किंवा तीन भाग सोडल्यास उर्वरित सर्व भागांचा एकच गण सहभागी होणार असल्याचे चित्र सध्या आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट