३१ मे हा दिवस जगभर तंबाखुविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे लक्ष वेधत डॉ. मानधनीया म्हणाले, 'देशात तंबाखूमुळे घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, मुखाच्या कर्करोगामुळे दगावणाऱ्यांची संख्या अन्य कर्करोगाने दगावणाऱ्यांच्या तुलनेत ८० पटींनी अधिक आहे. तंबाखूमुळे ५ लाख ५० हजार पुरुष अकाली प्राण गमावतात. या तुलनेत महिलांची संख्या ही १ लाख १० हजार आहे.
धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासात राहणारे १ लाख नागरिकदेखील आयुष्यात कधीही व्यसन न केल्याने दगावतात. हृदयरोग, टीबीच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी पटींनी अधिक आहे. सरासरीने विचार केला तर देशात अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० टक्के हे कर्करोगाचे बळी आहेत. तर टीबीचा यातला वाटा ३० टक्के आहे. यातून होणारी आर्थिक हानी लक्षात घेतली तर देशात दरवर्षी तंबाखूमुळे १ लाख ४ हजार कोटी रुपये खर्च होतात.
त्यापैकी १६ हजार ८०० कोटी रुपये हे केवळ त्यामुळे होणाऱ्या कर्करोगावरच्या उपचारावर खर्च होतात. सरासरी लोकसंख्येचा विचार केला तर देशातील २७ कोटी ५० लाख जनता तंबाखूचे सेवन करते. तर १६ कोटी ५० लाख लोक हे सिगारेट, बिडी ओढतात. दोन्ही व्यसने असणाऱ्यांचे प्रमाण हे साडेसात कोटी आहे. त्यामुळे सामान्यपणे दगावणाऱ्यांपेक्षा कर्करोगाची जोखीम ही ६० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांमुळे हृदयरोग, कर्करोग, श्वसनाचे विकारांनी दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट