Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

अकरावी प्रवेशांसाठी चांगलीच चढाओढ

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

अकरावी बायफोकल विज्ञान शाखेच्या गुणवत्ता यादीने प्रवेशांचे गणित अधिक किचकट होण्याची शक्यता आहे. तब्बल २३१० विद्यार्थी ९० टक्क्यांच्यावर गुण प्राप्त करणारे असून त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी चांगलीच चढाओढ बघायला मिळणार आहे.

नागपूर शहरातील विज्ञान शाखेच्या प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाते आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमधील बायफोकल आणि जनरल सायन्स शाखांच्या जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. जनरल सायन्सला प्रवेश मिळण्यास अडचण येणार नसली तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बायफोकलच्या जागांसाठी मात्र मोठी चुरस बघायला मिळत आहे. त्यातच यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाली असल्याने एकसारख्या गुणांवर अनेक विद्यार्थी आहेत.शुक्रवारी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील पहिले सहाही विद्यार्थी हे १०० टक्के गुण मिळवणारे आहेत. यातील पहिले पाच विद्यार्थी ‌हे सीबीएसईचे असून एक विद्यार्थी राज्य मंडळाचा आहे. राष्ट्रीय छात्रसेना, स्काउट, चित्रकला किंवा क्रीडा या विषयांकरिता मिळालेले गुण मिळवून या सहा जणांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. चार जणांना ४९९ गुण असून ४९८ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात आहे.

केंद्रीय प्रवेश समितीने ६०४१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर तसेच आधी जाहीर केलेल्या केंद्रांवर ही यादी उपलब्ध करुन देण्यात आली. आज जाहीर केलेल्या यादीत विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, मिळालेले गुण, परीक्षा मंडळ, टक्केवारी तसेच त्यांनी सहभाग घेतलेल्या अभ्यासेतर विषयांमध्ये मिळालेले गुण अशी सगळी माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांचे प्रवेश तीन जुलै रोजी करण्यात येणार आहेत.



सीबीएसईचा वरचष्मा

शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला आहे. यादीत 'टॉप' करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत. सीबीएसईतून दहावी केल्यानंतर बारावीसाठी मात्र या विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या कॉलेजेसमध्ये रुची दाखवली आहे. ३ जुलैपासून स्पॉट अॅडमिशनला सुरुवात होईल. दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करावे लागतील व एकदा निवडलेल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांना आपसात कॉलेज बदलून घेता येणार नाही. स्पॉट अॅडमिशनच्या वेळी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांसह हजर राहावे, असे केंद्रीय प्रवेश समितीने कळविले आहे. ३ ते १० जुलैपर्यंत समितीच्या वतीने हे प्रवेश केले जातील. सुटीचा दिवस आणि रविवारीदेखील प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. या प्रक्रियेनंतर जागा शिल्लक राहिल्यास ११ जुलैला प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>