फास्ट इंटरनेट कनेक्टिविटी आणि सर्वच गावांना तंत्रज्ञानासोबत जोडता यावे, यासाठी ग्रामपंचायतअंतर्गत फायबर ऑप्टिकची सुरू असलेली कामे वादात सापडली आहेत. पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जागेतून फायबर ऑप्टिक टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, गावकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा याला तीव्र विरोध होत आहे. राखीव जंगलात खोदकाम करण्याच्या नियमावलीवर लवकरच वनविभागासोबत चर्चा करू, अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी दिली.
गावे इंटरनेटनी जोडण्यासाठी जिल्ह्यात खोदकाम करण्यात येत आहे. पण, वन्यजीवांचा अधिवास असलेल्या कोलितमारा क्षेत्रातून रस्त्यांच्या दुतर्फा सर्रासपणे झाडांची कत्तल सुरू आहे. पावसाळा तोंडावर असतानाही येथील खड्डे बुजविण्याचे गांभीर्य ग्रामपंचायतीने दाखविले नाही. यावर वनविभागाला काहीही माहिती नसून बीएसएनएलने तपासणी करण्याची ग्वाही दिली आहे. वन्यजीवांचा वावर असणाऱ्या क्षेत्रात खोदकामाला निर्बंध आहेत. तरीही, या क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा खोदकाम सुरू आहे. ही कामे केली जात असताना हजारो झाडांची सर्रासपणे मुळासकट कत्तल केली जात आहे. तर, काही झाडे वादळामुळे पडू शकतात. वन्यजीव कायद्यानुसार काही क्षेत्रात रस्त्यांची कामे करण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार, कोलितमाऱ्याजवळील सुवरधरा ते अंबाझरी या दहा किलोमीटरच्या मार्गावर ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडणाऱ्या ऑप्टिक केबल टाकण्याचे काम पाच महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा केलेली खोदकामे अजूनही अर्धवट आहेत. खड्डे बुजविण्यात आले नसल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी केला आहे. तर, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
डेडलाइन वाढली!
नागपूर जिल्ह्यातील तरोडी, खसाळा, खंडाळा, विहीरगाव आणि दाभा या पाच ग्रामपंचायती 'डिजिटल ग्राम' म्हणून जाहीर झालेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिकची कामे ऑगस्टपर्यंत करायची होती. मात्र, जिल्ह्यातील सर्व ७६९ ग्रामपंचायतींना आता ऑप्टिक फायबरने येत्या नोव्हेंबरपर्यंत जोडण्यात येईल, अशी माहिती खरे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट