म.टा.प्रतिनिधी,नागपूर
राजकीय पक्षांकडून आतापर्यंत होणाऱ्या गठ्ठा मतदार नोंदणीला पायबंद बसणार आहे. अशाप्रकारच्या नोंदणीमुळे काही मतदारांना होत असलेला त्रास व अडचणी लक्षात घेता या गठ्ठा पद्धतीने अर्ज करू नये, असे आवाहन मतदारांसोबतच इतरांनाही करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी, मतदार नोंदणीबाबतचे दावे व हरकती दाखल करण्यासाठी १६ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. तर, मतदार नोंदणीची विशेष मोहीम १८ सप्टेंबर व ९ ऑक्टोबर या रविवारदिनी राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
या मोहिमेसाठी सर्व मतदान केंद्रांतील केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे नोंदणी करता येईल. मनपाच्या हद्दीत १ जानेवारी २०१६ पर्यंत २० लाख २१८ मतदारांची संख्या होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत १६,७७० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे शहरात २० लाख १६,९८८ एवढे मतदार आहेत. १६ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मतदारजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अर्जदार आपले नाव मतदारयादीत समाविष्ट झाले किंवा नाही हे www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. ज्यांचे नाव मतदारयादीत नाही त्यांनी या संधीचा घ्यावा व आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे. महापालिकेच्या सर्व झोनल कार्यालयांमध्ये अर्जस्वीकृती केंद्र उघडण्यात आले आहेत. याकरिता झोनल कार्यालयातील सर्व सहायक आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
--प्राचार्य महाविद्यालयात नोडल अधिकारी
निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाने नागपूर शहरातील महाविद्यालयात अर्जस्वीकृती केंद्र उघडले आहेत. याकरिता प्राचार्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्टुडंट अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे मतदार नोंदणी अर्ज स्टुडंट अॅम्बेसेडरकडे भरून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट