वाहन चोरी गेल्यानंतर तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाताना वाहनमालकाची भंबेरी उडते. कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये जावे, कशी तक्रार करावी, हे सुचत नाही. तोपर्यंत चोर वाहन घेऊन पळून जाईल, अशीही भीती असते. परंतु, आता वाहनचोरीची तक्रार करण्यास चालकाला कोणतीही अडचण येणार नाही. तो घरबसल्या वाहनचोरीची तक्रार करू शकतो. त्याची तक्रार येताच पोलिस वाहनाचा शोध सुरू करतील. यासाठी लवकरच पोलिसांचे ई वाहनचोरी अॅप येणार आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली. दीक्षित यांनी नागपूर शहर व परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांची रविवारी सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे बैठक घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त एस. पी. यादव, पोलिस सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षलविरोधी अभियानचे प्रमुख शिवाजी बोडखे, उपायुक्त रंजनकुमार शर्मा यावेळी उपस्थित होते.
चेनस्नॅचर्सची खैर नाही
'वाहनचोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला आहे. सोनसाखळीचोरांना कठोर शिक्षा व्हावी, याकडे आता लक्ष लागले आहे. सोनसाखळी चोरी प्रकरणात आता केवळ चोरीचाच ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल न करता ३७९ अ व ब नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये कमीत कमी पाच व जास्तीत जास्त १४ वर्षांची शिक्षा व २५ हजार रुपयांपर्यंत दंड आहे. राज्यात सोनसाखळी चोरीच्या घटना ९०० ने कमी झाल्या आहेत', असे दीक्षित यांनी सांगितले. गडचिरोलीतील पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे. चकमकीत माओवादी रजिता ही ठार झाली. पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोलीत पोलिस मित्रही चांगले काम करीत आहे, असेही दीक्षित यांनी सांगितले.
वैयक्तिक कारणांनी बदली रद्द
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तेक्षप नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात केले होते. मात्र, नागपुरात बदली झालेल्या तीन उपायुक्तांनी त्यांची बदली रद्द केली, याबाबत विचारणा केली असता दीक्षित म्हणाले, 'त्यांना वैयक्तिक अडचणी आहेत. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात आली.' आधीच याबाबत का विचार करण्यात आला नाही, असे विचारले असता त्यांनी मौन बाळगले.
दागिन्यांचा विमा काढा घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरांना पकडण्याची पोलिस अपयशी ठरत आहेत, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस काय करीत आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात दीक्षित म्हणाले, 'नागरिकांनी आपल्या दागिन्यांची योग्य ती काळजी घ्यावी. दागिन्यांचा विमा काढावा. घरात अलार्म सिस्टिम व सीसीटीव्ही लावावे.'
सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना योग्य ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. चंद्रपूर येथे दोन सामाजिक कार्यकर्त्यांवर अॅसिड हल्ला झाला. त्यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही दीक्षित यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट