पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या ओळीत बसलेल्या व्यक्तीची प्रगती. हे प्रत्यक्षात आल्यास देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल. हीच देशाची नीती असायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
येथील दीनदयाल बहुद्देशीय प्रसारक मंडळाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, समितीचे सचिव प्राचार्य डॉ. प्रकाश नंदूरकर, दीनदयाल बहुद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर, सचिव विजय कद्रे उपस्थित होते. सरसंघचालक म्हणाले, नीती ठरविणे हे सरकारचे काम नाही. समाजातूनच योग्य नीती आली पाहिजे. जुन्यातून काय स्वीकारण्यासारखे आहे, त्याचा काय उपयोग होऊ शकतो हे पाहून योग्य नीती ठरवायला हवी. त्यासाठी आजही पंडितजींचे विचार अत्यंत मार्गदर्शक ठरतात. त्यांची जन्मशताब्दी साजरी करीत असताना त्यांच्या विचारावर आपली जीवन पद्धती राहील याचे भान आपण ठेवले पाहिजे, असेही भागवत म्हणाले. प्रारंभी जन्मशताब्दी महोत्सव आयोजन समितीचे सचिव डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात जन्मशताब्दी वर्षात झालेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. तर दीनदयाल बहुद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. पहिल्या सत्रात दीनदयाल उपाध्याय प्रसारक मंडळाच्यावतीने यवतमाळ शहराजवळ निळोणा परिसरात बांधण्यात आलेल्या कृषी संशोधन व प्रशिक्षण याचे लोकार्पण व पंडितजींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट