नागपूर : कामात पारदर्शकता असावी. आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याची संधीच अधिकाऱ्यांना मिळू नये यासाठी तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्या करण्यात येतात. कामात शिस्त असावी म्हणून बदल्याचे हे नियम आता बाजूला ठेऊन अनेक अधिकारी, कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून एकाच पदावर काम करत असल्याचे वास्तव जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. याबाबत एका कर्मचारी संघटनेनेच नाराजी व्यक्त करत 'टेबलांना चिकटलेले अधिकारी बदला' अशी मागणी शासनाकडे केली आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या एका दमात करण्यात आल्या. अनेक अधिकाऱ्यांचा त्या त्या पदावरील तीन वर्षांचा काळ पूर्ण झाला होता, तर काहींना १८ महिन्यांच्या काळात दोनदा अथवा तीनदा बदल्यांना सामोरे जावे लागले. सनदी अधिकाऱ्यांबाबत राज्य शासनाकडून अशी भूमिका घेतली जात असताना नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र अनेक अधिकारी कर्मचारी एकाच टेबलवर वर्षानुवर्षे चिकटून असल्याचे चित्र आहे. या व्यवस्थेमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याची तक्रारच आता एका कर्मचारी संघटनेने शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या होमटाउन नागपूरमध्ये नोकरशाहीच्या विविध स्तरांतील काही टक्के मंडळींच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट नाराजी बोलून दाखवली होती. काही मंत्री आणि मोजके सनदी अधिकारी यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण झाला. त्यातूनच अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ७३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या एका दमात करण्यात आल्या. सीताराम कुंटे, सतीश गवई, आय. एस. चहल, दीपक कपूर अशा सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांनाही मुदतीआधीच बदलीला सामोरे जावे लागेल.
--गटबाजी सोडा, कामे करा!
वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांसाठी हा न्याया लावला जात असताना त्यांच्याखालील यंत्रणेकडे शासनाने साफ दुर्लक्ष केले असल्याचेच चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ते त्याच पदावर काम करत असल्याचे चित्र आहे. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार नुकताच काढून दुसऱ्या अधिकाऱ्यावर देण्यात आला. यावरूनही आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकाच टेबलवर १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विभागीय आयु्क्त कार्यालयातही काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर चिकटून आहेत. जनतेची कामे करण्यासाठी एकत्र आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गटबाजीतून बाहेर पडून कामे करण्याची गरज कर्मचारी संघटनेनेच व्यक्त केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट