श्रीमंता घरचे दुखणे म्हणून लठ्ठपणाकडे पूर्वी पाहिले जात होते. पण, बदलत्या बैठ्या जीवनशैलीमुळे मध्यमवर्गीयांनाही आता लठ्ठपणाने घेरले आहे. तरुण वयातच वजन वाढू लागल्याने रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मेंदूचा झटका (स्ट्रोक) हे विकार होण्याची शक्यता वाढली आहे. जगभरात २५ ते ३० वर्षे वयोगटात ही समस्या अधिक आढळून येत असून दहा वर्षांच्या आतल्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आले आहे.
वजन वाढणे फक्त सौंदर्याला बाधक नसते, तर ते त्याहीपेक्षा कितीतरी पटींनी आरोग्यासाठी घातक ठरणार असते. लठ्ठपणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. काही वर्षांपूर्वी चाळिशीनंतर वजन वाढताना दिसत असे. सध्या मात्र अगदी लहान वयात, तरुण वयातसुद्धा लठ्ठपणा येताना दिसतो. लठ्ठपणातील सर्वांत मोठा दोष म्हणजे यामुळे शक्ती कमी होते. सप्तधातूंपैकी फक्त मेदाचेच भरण-पोषण होत राहिल्याने बाकीचे धातू एका अर्थाने कुपोषित राहतात, परिणामतः रोगप्रतिकारशक्ती कमी होते. एकंदर शरीरशक्ती, उत्साह, सतेजता यांचाही लोप होते. लहान वयात किंवा तरुण वयात वजन वाढले तर त्याचा परिणाम पुढच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. श्वासाचे विकार, हाडे कमकुवत राहणे, सहजासहजी हाड तुटणे, कमी वयात रक्तदाब, मधुमेह होणे, मानसिक पातळीवर आत्मविश्वास कमी होणे, गर्भधारणा होऊ न शकणे वगैरे अनेक त्रासांना आमंत्रण मिळू शकते असे ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. सचिन सरदेशपांडे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट