'राज्यातील मित्रपक्षाने सकारात्मक सूचना केल्यास त्याचे स्वागत करण्यात येईल, कुठल्याही स्थितीत दबावाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही', असा दम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याच्या प्रभारी सरोज पांडे यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला.
सरोज पांडे यांच्या इशाऱ्यानंतर युतीतील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. गोवा येथे शिवसेनेने लावलेल्या होर्डिंग्समुळे गेल्या चार दिवसांपासून मित्रपक्षांमधील संबंध आणखी ताणले गेले. सत्तेत सहभागी झाल्यापासून भाजप-शिवसेनेत तणातणी सुरू आहे. परस्परांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपर्यंत हा सामना आणखी रंगण्याचे संकेत आहेत. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकासाचा अजेंडा राबवत आहेत. त्यात सर्वांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना मित्र पक्षाकडून तसे न होता त्यात अडथळे आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही दबाबतंत्राला आम्ही भीक घालणार नाही, अशावेळी विचार करण्याची गरज त्यांनाही पडेल', असा गर्भीत इशाराही पांडे यांनी दिला.
'केंद्र सरकारचे दोन वर्षे अभूतपूर्व राहिले. काँग्रेस नेते देशभरात आमच्यावर आरोप लावत असले तरी, इतकी वर्षे सत्तेत राहिल्यानंतरदेखील त्यांनी काहीच केले नाही. राजकीय अस्तित्व राखण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. देशातील जनता त्यांच्याच कार्यकाळाचा लेखाजोखा मागणार आहे', असा प्रतिहल्ला सरोज पांडे यांनी काँग्रेसवर चढवला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट