नागपूर/वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आगीतील बळींची संख्या १९वर पोहोचली आहे. बुधवारी आणखी तीन जवानांचे मृतदेह सापडले. एकूण मृतांपैकी १३ जवानांची ओळख पटली आहे. पाच जवानांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर या भांडाराला भीषण आग लागली होती. आगीमुळे दारूगोळ्यांचे स्फोट झाले. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचा धोका वर्तविला जात आहे.
घटनेतील मृतदेहांचे डीएनए करण्यात आले. ओळख न पटलेल्यांचा व्हिसेरही घेण्यात आला. मृतांच्या नातेवाइकांना बोलावून मृतदेहांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी आढळलेले तीनही मृतदेह डीफेन्स सिक्युरिटी कोअरच्या (सीएडी) जवानांचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून पुलगाव बुधवारी बंद होते. तीन जवानांवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सारा गाव हळहळत होता.
सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन जवानांना विमानाने पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. यात सीएडीचे डेप्युटी कमांडंट कर्नल गजेंद्र सिंह, शरद यादव आणि जगदीश चंद्र यांचा समावेश आहे. दरम्यान, या आगीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या आगीमुळे झालेल्या स्फोटांचे हादरे परिसरातील बारा गावांना बसले. एकट्या आगरगाव येथील ३४७ घरांचे नुकसान झाले आहे. पिपरीतील येथील शंभर, तर नागझरी येथे २० घरांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटांच्या हादऱ्यातून गावकरी सावरत आहेत. घराकडे परतत आहेत. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी या नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. गावकऱ्यांशी संवाद साधला.
ही आग संशयास्पद पुलगावच्या दारूगोळा भांडारात लागलेली आणि अनेक जवानांचा जीव घेणारी भीषण आग संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांचा भडका उडाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या मुखपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट