वाघ रस्त्यावर ठाण मांडून बसलेला असतो. तो उठून जाईपर्यंत साऱ्यांना वाट पहावी लागते. अनेकदा बाजाराला निघालेला गावकरी रिकाम्या हातानेच परततो. दूध घेऊन निघालेले आठवड्यातून चार दिवस पवनीला जातच नाहीत. गावाला तिन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा आहे. एक मार्ग शिल्लक राहतो. पण, आता त्यावरही वाघोबा असतो. चहूबाजूचे संकट पाउनगाव रोज अनुभवत आहे. येथील गावकरी जगत आहे. गावातील व्यवहार ठप्प पडले आहेत. म्हणून गावाचे पुनर्वसन करून सुखाने जगू द्या, अशी आर्जव पाऊनगाववासीयांनी खासदार नाना पटोले यांच्यासमोर मांडल्या.
परसोडी येथील रूपचंद उत्तम माटे (४९) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गावातील वाघाच्या हल्ल्यातील तिसरा बळी गेला. गावकऱ्यांना धीर देत रुपचंद यांच्या कुटुंबाला आठ लाखांची मदत देण्याच्या निमित्ताने खासदार पटोले यांनी गावाला भेट दिली. सोबतच उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील दुर्गम परसोडी, पाउनगाव, खापरी येथील गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रोजची वाघाची दहशत गावकऱ्यांनी पटोले यांच्यासमोर मांडली.
पाउनगावचे पोलिस पाटील नरेश कुकुट म्हणाले, जंगलात शेती, शेतीत वाघ मग शेती करायची कशी? गावकऱ्यांच्या या सर्व समस्यांवर वाघाचा बंदोबस्त हे एकमेव उत्तर आहे. याचा विचार करण्यात यावा, असेही ते म्हणाले. दरम्यान, नरभक्षक वाघाचा लवकरच बंदोबस्त करण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले. उप वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनीसुद्धा गावकऱ्यांना वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट