पक्षाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या शिवसेनेने राज्यात अनेक चढउतार बघितले. मात्र, पक्षाला अजूनही विदर्भात पाय घट्ट रोवता आलेले नाही. चार खासदार आणि तितकेच आमदार विदर्भात असताना पक्षाचा कुठेही उत्साह आणि जल्लोष दिसत नाही आणि ना शेतकऱ्यांचे अश्रु पुसणारे हातही.
शिवसेनेचा रविवार, २० जून रोजी सूवर्णमहोत्सवी वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या काळापासून दशकापूर्वीपर्यंत विदर्भात सेनेचा चांगला आवाज होता. १९९०पासून वैदर्भीय तरुणांना या पक्षाचे खास आकर्षण होते. परंतु, 'आवाज कुणाचा' ही घोषणा अलीकडे विरघळल्यासारखी झाली आहे. १९९५मध्ये विदर्भाने सेनेला भरभरून साथ दिल्याने राज्यात भगवा फडकला. राज्यात युतीची सत्ता असताना विदर्भात सेना पॉवरफुल झाली. या भागावर लक्ष केंद्रित केले. परंतु, हळूहळू गळतीदेखील लागली. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्काही घसरत गेला. दोन दशकांपूर्वीप्रमाणेच यश यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही विदर्भाने दिले. पण, विधानसभा निवडणुकीत त्याप्रमाणात पक्षाला यश मिळवता आले. केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी झाल्याने सेनेची डरकाळी मुंबईत गाजत असली तरी, त्याचा 'इको' संघभूमीत ऐकू येत नाही. त्यावरून पक्षाचा आधीसारखा प्रभाव राहिलेला नाही, अशी कबुली शिवसैनिकच देत आहेत. शिवसेनेचा पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिममध्ये बऱ्यापैकी जोर होता. दशकभरापूर्वीपर्यंत असलेला दबदबा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील सेनेचे दिंडी, यात्रा आणि सभा गाजल्या. रामटेकपासून शेगावपर्यंत सर्वत्र सभा झाल्या. परंतु, आता सत्तेत आल्यानंतर या सभा आणि त्यावेळी दिलेल्या आश्वासनांचा सेना नेत्यांना विसर पडला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी युती तुटली. विदर्भात भाजपला त्याचा लाभ झाला पण, सेनेला विदर्भ विरोधाचा फटका बसला. सेनेने विदर्भाकडे पाहिजे तसे लक्ष दिलेले नाही. दिवाकर रावतेंसारख्या संपर्क प्रमुखांचा अपवाद वगळता अन्य संपर्क प्रमुखांचे शिवसैनिकांसाठी दर्शन दुर्लभच राहिले. मुंबईप्रमाणे संघटन बांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील संपर्क प्रमुखांनी वेळ दिला नाही. परिणामी एकेकाळी तरुणांना आकर्षणाचे केंद्र असलेला हा पक्ष गेल्या एक-दीड दशकात अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. भाजपसोबत सध्या असलेली युती राहते की तुटते, याची चर्चा नव्याने सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई प्रमाणे संघटनेचे वैभव प्राप्त करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकांमध्ये सेनेला नव्या ऊर्जेने मैदानात उतरावे लागेल, असे पक्षाचे विदर्भातील नेते कबूल करतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट