मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.तरीही, एकेकाळी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आंदोलने करणारे मुख्यमंत्री गप्प आहेत. ऐन दिवाळीतही शेतकरी व गरिबांची दिवाळी अंधारात जात असल्याने याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मुख्यमंत्र्यांसाठी डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, आलू-वांगे, टमाटर आदी खाद्यान्न आणि भाजीपाला भेट स्वरूपात दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्षा अलकाताई कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शने करून लक्ष वेधले गेले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांना निवेदन व भेटवस्तू मुख्यमंत्र्यांसाठी सोपविण्यात आल्या.
डाळ महाग झाल्याने आता दिवाळीला फराळ म्हणजे चकल्या, शेव, आणि इतर पदार्थ बनविणे गोरगरिबांच्या आटोक्यबाहेर गेले आहे. हे भाजपचे ‘अच्छे दिन’ आहेत. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलने करायचे. कापूस,उस आदींना योग्य भाव मिळावा, यासाठी आघाडी सरकारवर टीका करायचे. आता भाजप सत्तेत आल्यावर मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या आंदोलनाचा विसर पडला आहे. गेल्या दोन वर्षात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुख्यमंत्र्यांच्याच जिल्हयातील कोंढाळी येथील मूर्ती गावातील खवसे कुटुंबातील एका शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भरघोस पाऊस पडूनही नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जाम-नागपूर महामार्गावरील हळदगाव शिवारात मधुकर मडकाम (रा. जाम) यांनी झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी शेती लागवडीसाठी बँक ऑफ इंडिया शाखा जाम येथून वडिलांच्या नावे कर्ज घेतले. लग्न, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दहा लाखांचे खासगी कर्ज घेतले होते. भंडारा जिल्ह्यातील पळसपाणी येथील शेतकरी आनंदराव वरठे (वय ५०) यांनी झाडाला गळफास घेऊन काल आत्महत्या केली. मुडाणा (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव लोखंडे (वय ६५) यांनी जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी यापूर्वी केलेल्या आंदोलनाचा त्यांना विसर पडला आहे. याची जाणीव करून देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नारे निर्देशने देण्यात आली. आंदोलनात शोभा भगत, लता माटे, सुषमा बाभले, शांता हाडके, सुशीला ढाकणे, शालिनी सव्वालाखे, सूर्यकांता नाचणे, विमलताई बसेशवर, तुळस हिवराळे, मनीषा जेगरे यांच्यासह मोठया संख्येत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट