दुर्धर आजारांशी झुंजणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील गोरगरिबांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना वरदान ठरत आहे. या माध्यमातून हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, कर्करोगासारख्या दुर्धर व्याधींसोबतच अस्थिव्यंग, अपघाती रुग्णांना ही योजना जीवनदायी ठरत आहे. यात दीड लाखापर्यंतचा उपचार खर्च योजनेशी लिंक असणाऱ्या रुग्णालयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत वळती केले जातात.
रुग्णाच्या एनरॉलमेंट नंतर प्रक्रिया सुरू होते. शल्यक्रियेनंतर दाव्या पोटीची रक्कम संबंधीत रुग्णालयांच्या अधिकृत सरकारी खात्यावर वळती होते. मेडिकल, मेयोत होणाऱ्या रुग्णांच्या शल्यक्रियांची रक्कम ही अधिष्ठातांच्या खात्यावर वळती होते. मात्र मेयो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप विद्यमान अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी वाहणे (गजभिये) यांच्या नावाचा अर्ज केलेला नाही. त्यामुळे विमा कंपनीने दाव्यांपोटीची रक्कम पाठविण्यास अमर्थता दर्शविली आहे. त्याचा फटका शस्त्रक्रियेसाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठा दारांना बसला आहे. जुन्या रकमेची बिले सहा सहा महिन्यांपासून रेंगाळत पडल्याने या पुरवठादार कंपन्यांनी नवा साठा देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून एकही शस्त्रकिया झालेली नाही. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. यावरून प्रशासकीय पातळीवर रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ केला जातो, हे सिद्ध होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट