Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

बैठकीसाठी नाही जैवविविधता मंडळाला वेळ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्रातील जैवविविधतेची काळजी वाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य जैवविविधता मंडळाला आपल्या सदस्यांची बैठक घेण्यास मागील सहा महिन्यांपासून मुहूर्त सापडलेला नाही. किंबहुना, सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ संपून दोन महिने उलटून गेल्यानंतरही नव्या सदस्यांची नियुक्ती करण्याचे कामही मंडळाला जमलेले नाही.

राज्यातील जैवविविधतेसंबंधी धोरण ठरविणे आणि त्यासाठी यंत्रणांकडून काम करून घेण्याचे काम जैवविविधता मंडळाकडून अपेक्षित आहे. वन्य व पाळीव प्राणी, त्यांचे अधिवास आणि वनस्पतींचे संवर्धन, शाश्वत उपयोग आणि विकास होणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींचे स्वामित्व स्थानिकांकडे असल्याने त्याबाबतची कामे करण्यासाठी गावस्तरावर जैवविविधता समिती स्थापन करणे गरजेचे आहे. अशा समित्या स्थापन करण्यास मंडळाने प्राथमिकता देणेही अपेक्षित आहे. याशिवाय, स्थानिक जैवविविधतेच्या नोंदी असलेले पब्लिक बायोडायव्ह‌र्सिटी रजिस्टर तयार करण्याचा कार्यक्रमही आखण्यात आला. या सगळ्या योजना कागदावर चांगल्या वाटत असल्या, तरी तुरळक अपवाद वगळता या संपूर्ण आघाडीवर मात्र मंडळाचे काम निराशाजनक राहिले आहे.

मंडळात नेमके काय काम झाले, याचा लेखाजोखा ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या मंडळ सदस्यांची साधी बैठक घेणेही मंडळाला मागील सहा महिन्यांत शक्य झालेले नाही. नोव्हेंबर, २०१५मध्ये सदस्यांची बैठक झाली होती. नियमाप्रमाणे तीन महिन्यांनी बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, सहा महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप अशी बैठक झालेली नाही. नोव्हेंबरच्या बैठकीत राज्याच्या वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनी जैवविविधतेशी संबंधित विविध कामे करण्याबाबत सूचना ‌केल्या होत्या. त्याबाबत काय काम झाले, याची इतर सदस्यांनादेखील पुरेशी माहिती नाही.

मुळात, सध्याच्या सदस्यांची दोन वर्षे उलटून गेली असून नवीन सदस्यांच्या नेमणुका आतापर्यंत होणे गरजेचे होते. त्याचादेखील मुहूर्त शोधण्यात मंडळ आणि राज्यशासन व्यस्त आहे. सदस्य नेमणुकीचा प्रस्ताव अजूनही मंत्रालय स्तरावर पडून आहे.

राज्यस्तरावरील बैठक झालेली नाही तशाच जिल्हास्तरावरील समित्यांच्या बैठकीसंदर्भातही आनंदी-आनंद आहे. अकोला आणि नागपूर येथे तणमोरासारख्या दुर्मिळ पक्ष्याचे अस्तित्व आहे. मात्र, या पक्ष्यासंदर्भात आणि जैवविविधतेशी संबंधित इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आजवर जिल्हा समित्यांची बैठकच झालेली नाही. मंडळात सदस्य असलेल्या तसेच सातत्याने जैवविविधतेवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांमध्ये मंडळाच्या कामाबद्दल प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवे सदस्य आठवडाभरात

दरम्यान, गेल्या सहा महिन्यात बैठक होऊ शकली नाही, हे वास्तव असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी मान्य केले. त्यामागील नेमकी कारणे मात्र डॉ. बर्डेकर यांनी सांगितली नाहीत. मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याबाबत इच्छुकांचे अर्ज आले आहेत. नवीन सदस्यांच्या नियुक्तीवर आठवड्याभराच्या काळात निर्णय होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. जैवविविधता समित्या स्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य घेण्याबाबत निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, आजवर फारसा लोकांपर्यंत न पोचलेला हा विषय अधिकाधिक लोकांना माहीत होईल. त्यातून गावोगावी जैवविविधता समित्या स्थापन होतील, अशी अपेक्षाही डॉ. बर्डेकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>