बाजारात रोखच उपलब्ध नसल्याने अर्थात ‘करन्सी क्रन्च’ निर्माण झाल्याने हा वीकेन्ड सर्वसामान्यांसाठी ‘ब्लॅक वीकेन्ड’ ठरणार आहे. एटीएम कोरडे ठक्क, त्यात बँकाही बंद, यामुळे खातेदारांच्या हाती पैसाच नाही. अशाने दैनंदिन खरेदी-विक्री संकटात आली आहे.
पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून सर्वसामान्यांची रोख चलनासाठी धावाधाव सुरू आहे. ज्यांचे हातावर पोट आहे आणि दैनंदिन खर्च रोजच्या वेतनातून भागवतात, त्यांच्या हाती पैसाच नाही. अशांची प्रचंड गैरसोय या निर्णयामुळे होत आहे. पण आता शनिवार-रविवारी या संकटात दुहेरी भर पडली आहे. हा शनिवार दुसरा असल्याने बँकांना लागून दोन दिवसांची सुट्टी आहे. यामुळे एकीकडे बँका बंद असताना दुसरीकडे एटीएमदेखील ठप्प आहेत.
राष्ट्रीयीकृत अर्थात सरकारी बँकांची एटीएममध्ये रोख भरण्याची कुठलीही विशिष्ट रचना नाही. बँकांच्या शाखांकडे आलेली रोखच एटीएममध्ये भरली जाते. पण सध्या खातेदारांची बँकेत गर्दी असल्याने शाखांनी एटीएमला सर्वात कमी प्राधान्य दिले आहे. अशावेळी शुक्रवारी दुपारी काही एटीएममध्ये रोख भरण्यात आली. ती शुक्रवारी रात्री तर अनेक एटीएममध्ये शनिवारी सकाळीच संपली. यामुळे नागपूर शहरातील ४०० पैकी ९० टक्क्यांहून अधिक एटीएम शनिवारी पूर्णपणे ठप्प होते.
खासगी बँकांचे एटीएम शहरात अधिक आहेत. त्यात खासगी बँकांनी एटीएममध्ये रोख भरणा करण्याचे कंत्राट दिले आहे. या बँकांना थेट रिझर्व्ह बँकेकडून रोख मिळते. ती ते शुक्रवारी घेतात व एका ठिकाणी जमा करतात. गरजेनुसार त्या-त्या एटीएममध्ये सुट्टीच्या दिवशी रोख भरणा केला जातो. पण सध्या चलन मागणीचा जोर खूप अधिक असल्याने त्यांना रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी हवी तशी रोख दिलीच नाही. यामुळे या बँकांचादेखील नाईलाज झाला. खासगी बँकांच्या एटीएमनेदेखील शनिवारी सकाळीच अंग टाकले. बहुतांश एटीएम ठप्प झाल्याचे दिसून आले. एकूणच दुहेरी फटक्यात सर्वसामान्यांचे या आठवडाअखेरीस हाल सुरू झाले आहेत.
दोन हजार घेऊन काय करणार?
शनिवारी सायंकाळपर्यंत काही निवडक एटीएम सुरू होते. पण, या एटीएममधून फक्त २ हजार रुपयांची नोट निघत होती. आता ही २ हजार रुपयांची नोट घेऊन भाजी, फळांसोबत अन्य छोटे-मोठे खर्च करणार तरी कसे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला. सधन असलेले उच्च मध्यमवर्गीय तरी कार्डने पेमेंट करू शकतात. तेदेखील भाजी, फळे आदी वस्तू खरेदी कशा करणार? अनेक घरांत आठवड्याच्या अखेरीस आठवडाभराची भाजी खरेदी केली जाते. ते २ हजार रुपयांची नोट घेऊन २०, ३०, ४० रुपयांची भाजी कशी खरेदी करणार, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट