नागपूर : पर्यावरणप्रेमी नागरिकांनी १ जुलै रोजी अंबाझरी तलावावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. मात्र, वनविभागाने या तलावावर म्हशींना पाणी पिण्यास नेण्याची परवानगी दिली. त्यामुळे राखीव वनक्षेत्रात चराईचा धोका निर्माण झाला असून, लावलेली रोपटे धोक्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही परवानगी देताना वनविभागाने या गायी-म्हशींकडून शिस्तीची अजब अपेक्षा केली आहे. त्यामुळे त्या कितपत शिस्त पाळणार, हा प्रश्नच आहे.
दोन कोटी अभियानांतर्गत झालेले वृक्षारोपण आणि या परिसरातील इतर वृक्षराजीवरही या निर्णयामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पांढराबोडी येथील रहिवाशांच्या गायी-म्हशी पाणी पिण्याकरिता अंबाझरी तलावावर नेऊ दिल्या जाव्यात व त्यासाठी वनक्षेत्रातून मार्ग उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी पांढराबोडी येथील महादेव चौधरी आणि इतरांनी वनविभागाकडे केली होती. या संपूर्ण परिसरात पर्यायी वृक्षारोपण करण्यात आले असून राखीव वनक्षेत्र म्हणून ते घोषित केले आहे. असे असतानाही वनविभागाने गायी-म्हशींना अंबाझरी तलावावर पाणी पिण्यास नेण्याची आणि त्यासाठी राखीव वनक्षेत्रातून नेण्याची परवानगी दिली आहे.
गायी-म्हशींना पाणी पिण्यासाठी दररोज दुपारी १२ ते २ या वेळेतच नेले जावे आणि त्यांच्याबरोबर एक जबाबदार व्यक्ती असावी, असे वनविभागाने म्हटले आहे. या म्हशीमालकाने पाणी पिल्यावर सर्व जनावरांना आपल्याबरोबर परत आणले पाहिजे, असेही या आदेशात म्हटले आहे. ही दोन तासांची परवानगी देताना राखीव वनक्षेत्रात ही जनावरे पाणी पिण्याव्यतिरिक्त जणू काही साध्या गवताच्या पात्यालाही तोंड लावणार नाही, अशी अपेक्षा बाळगत वनखात्याने ही परवानगी दिली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
जनावरे इतरत्र कुठेही भरकटणार नाहीत व अवैध चराई होणार नाही, तसे झाल्यास मालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, चराईचे प्रकार वारंवार झाल्यास गायी-म्हशी जप्त करण्यात येतील. या सर्व अटी-शर्तींचे पालन केले जाईल असे शपथपत्र जनावरांच्या मालकाला द्यावे लागेल, असे वनविभागाने परवानगी पत्रात लिहिले आहे.
दरम्यान, या जनावरांवर लक्ष ठेवण्याची पुरेशी व्यवस्था केली असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. वनरक्षक आणि वनमजूर हे या जनावरांवर लक्ष ठेवतील आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी सांगितले. मात्र, अशी परवानगी देण्यावरच आक्षेप उपस्थित केले जात आहेत. चराई आणि गायी-म्हशींचे मालक यांचे पूर्वानुभव लक्षात घेता चराई होणारच नाही, याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. दोन कोटी झाडे लावण्यासाठी अनेकांचे कष्ट आणि मोठ्या प्रमाणात निधी खर्ची पडला असताना चराईला रान मोकळे करणाऱ्या अशा परवानग्या देणे चुकीचे असल्याची टीका सृष्टी पर्यावरण मंडळाचे स्वानंद सोनी यांनी केली आहे.
पर्यावरणवाद्यांचा कडाडून विरोध
वनविभागाने दिलेली ही परवानगी लगेचच वादग्रस्त ठरू लागली असून त्या विरोधात नागपुरातील पर्यावरणवादी कार्यकर्ते एकवटले आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांच समावेश असलेल्या नागपूर पर्यावरण कृती गटाने याविरोधात वनविभागाचे प्रमुख सर्जन भगत यांना पत्र लिहिले असून वनक्षेत्रात घातक ठरणारी ही परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे. राखीव वनक्षेत्राकरिता लागू असलेल्या कायद्याचे पालन करावे आणि ही परवानगी रद्द करावी अशी मागणी या कृती गटाने केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट